◆माझी शाळा : श्रीकृष्ण राऊत◆

मी ज्या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत शिकलो त्या पातूरच्या  तुळसाबाई कावल विद्यालयाच्या स्थापनेला ह्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली.त्या निमित्त काढण्यात आलेल्या 'समर्पण' स्मरणिकेतील लेख-

◆माझी शाळा - श्रीकृष्ण राऊत◆

माणूस वयाने मोठा होतो.हुद्याने थोर होतो.पण त्याच्या मनात एक लहान मूल नेहमी हुंदडत असतं. नाचत असतं.ते मूल त्या मोठ्या माणसाचं बोट आपल्या बाळमुठीत पक्कं धरून ठेवतं.मोठ्या माणसाला ते त्याच्या बालपणात फिरवून आणतं.गाव-शिवाराचा फेरफटका मारतं.त्याच्या शाळेत त्याला वारंवार घेऊन जातं.तिथल्या झुल्यावर झोका देतं....

माझी शाळा - श्रीकृष्ण राऊत
_______________________

माणूस वयाने मोठा होतो.हुद्द्याने थोर होतो.पण त्याच्या मनात एक लहान मूल नेहमी हुंदडत असतं. नाचत असतं.ते मूल त्या मोठ्या माणसाचं बोट आपल्या बाळमुठीत पक्कं धरून ठेवतं.मोठ्या माणसाला ते त्याच्या बालपणात फिरवून आणतं.गाव-शिवाराचा फेरफटका मारतं.त्याच्या शाळेत त्याला वारंवार घेऊन जातं.तिथल्या झुल्यावर झोका देतं....

माझ्यातल्या मुलानंही मला असाच झोका दिला...

शाळेतले आपले सवंगडी कायम आठवत राहतात ....रमेश तायडे,समाधान गवई...जे आता ह्या जगातच नाहीत...पण आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनून राहिलेत...अधून मधून प्रत्यक्ष भेटणारे...मनातली शाळा जागवणारे....दशरथ अत्तरकार,मधुकर पाटील,तुकाराम देवकर,विनय गौतम,विनायक मुळे,सुगंधी बंधू,देऊळगावहून घोड्यावर जाणं-येणं करणारे पाटील बंधू...ज्यांना आम्ही 'संताजी- धनाजी' म्हणायचो...

'संताजी- धनाजी' वरून आठवलं....माणिकराव सर काय इतिहास शिकवायचे...असं वाटायचं आत्ता आपल्या समोर सर्व घटना घडत आहेत...भूगोलाचे नकाशे रंगविण्याची स्पर्धा आम्हा विद्यार्थ्यात तर खूपच अटीतटीची चालायची...माणिकराव सरांचा 'A-1'रिमार्क मिळाला पाहिजे म्हणून आम्ही वेगवेगळ्या रंगकांड्या अगदी बोटं रंगीबेरंगी होइस्तोवर  झिजवायचो...
सरांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात एखाद्या देशाची राजधानी चुकली की  ते पूर्ण वाक्य 500 वेळा लिहून आणायची शिक्षा व्हायची....आणि मग ती राजधानी पक्की लक्षात राहायची!

मुळे सरांनी शिकवलेली इंग्रजी तर अजून कामी पडते.माझे नाव 'श्रीकृष्ण' असल्याने मुळे सर मला नेहमी 'परमात्मा' म्हणायचे.वाक्यात शब्दाचा उपयोग जसा होईल  तसा त्या इंग्रजी शब्दांचा अर्थही बदलतो.हे सांगताना मुळे सर म्हणायचे,"परमात्मा,इंग्रजी लय लेकराची माय आहे!"

'सरलाबाईंची शाळा' म्हणून तेव्हा आमच्या शाळेची ओळख होती.सरलाताई गहिलोत मुख्याध्यापिका होत्या.त्यांनी शाळेला खूपच कडक  शिस्त लावली होती. शनिवारी शाळा सकाळची असायची.पाच मिनिटं उशीर झाला तरी फाटक बंद!फाटकाबाहेर ऊठबशा काढताना आम्ही स्वतःला बजावून सांगायचो : उद्या लवकर उठा!

हिवाळ्यात सकाळचे  तास वर्गाऐवजी मैदानातल्या हिरवळीवर कोवळ्या उन्हात भरायचे.खराट सर मराठी शिकवायचे.दहावीला बा.भ.बोरकरांची 'तेथे कर माझे जुळती' ही कविता अभ्यासक्रमात होती.सर बोच-या थंडीत तल्लीततेने कविता शिकवत असायचे....अवतीभवती बालकवींच्या कवितेतले हिरव्यागार गवताचे मखमाली गालिचे असायचे...गवताच्या हिरव्या पात्यांवर पहाटे पडलेले दवबिंदुंचे टपोरे थेंब मोत्यासारखे माळले जायचे.त्या शुभ्र स्फटिकमय मोत्यांवर सूर्यकिरण पडायचं...आणि त्या मोत्यांच्या इंद्रधनुष्यी ज्योती नजरेस पडल्या की सगळं काही विसरायला व्हायचं....

हे दृष्य अजूनही कधीमधी अवचितपणे माझ्या जाणीवेत जिवंत होतं...स्वप्नात येतं...माझ्या अंतःकरणात कविता पेरतं...त्या कविता मग माझ्या मनातून माझ्या नकळत उगवत राहतात...

अशीच एक कविता उगवली...'वीज' होऊन चमकली...अकरावीच्या 'युवक भारती'त अवतरली...आता ह्याच शाळेत मराठीचे सर-मॅडम विद्यार्थ्यांना ती शिकवत असतील...कदाचित त्यांना सांगत असतील...ह्या कवितेचा कवी...ह्याच शाळेत शिकला....ह्याच मैदानात खेळला....ह्याच हिरवळीवर बागडला...लहानाचा मोठा झाला... विद्यार्थी मित्रांनो, ही साधी शाळा नाही..ही आहे एका कवीची जन्मदात्री शाळा -

अकोला जिल्ह्यातल्या पातूरचे
तुळसाबाई कावल विद्यालय !
टी.के.व्ही.
२०१५
__________________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा