मेळघाटच्या कविता : इंद्रजीत भालेराव

कवी श्रीकृष्ण राऊत यांचा  'मेळघाटच्या कविता' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.गेल्या चाळीस वर्षापासून ते कविता लिहितात.त्यांचे याआधी चार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.हा त्यांचा पाचवा कवितासंग्रह आहे. 


मराठी कवितेच्या रसिकांना प्रामुख्याने गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत माहीत असले तरी त्यांनी आपल्या प्रत्येक संग्रहात वेगळा विषय आणि वेगळे वृत्त छंद उपयोजित केलेले आहेत.मेळघाटच्या कवितांमध्ये त्यांनी आदिवासी कोरकूंच्या लोकजीवनातल्या लोकलयी,लोकतत्त्वे,लोकभाषा,लोकसंकेत आणि लोकजीवनाचा उपयोग केल्यामुळे या कविता फार वेगळ्या झालेल्या आहेत. 


आदिवासींचं जगणं,वागणं,वाङ्मय आणि संस्कृती या सर्व कवितांमधून राऊत इतक्या समर्थपणे मांडतात की ते मुळात आदिवासी नाहीत हे लक्षातही येत नाही.राऊतांनी हे असं का केलं आणि त्यांना हे इतक्या चांगल्या पद्धतीने कसं जमलं ? असा प्रश्न आपणाला पडू शकतो.जो ज्या वर्गाचा,जातीचा,गटाचा आहे तो त्याच्याच कविता लिहितो हा आजचा वास्तविक भोवताल आहे.मग आदिवासी नसलेल्या राऊतांनी आदिवासी कविता का लिहिली आणि त्यांना ती कशी जमली ? या प्रश्नाचं एक उत्तर आहे. 


श्रीकृष्ण राऊत यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाने 2006 साली संशोधनासाठी आचार्य ही पदवी बहाल केली.त्यांच्या प्रबंधाचा विषय होता 'कोरकू आदिवासींच्या पारंपारिक मौखिक गीतांचा लोकतत्त्वीय अभ्यास' राऊत यांनी केवळ पदवीसाठी हा अभ्यास केला नाही.त्यात ते इतके बुडून गेले की त्या सगळ्या लोकलयी आणि तिथले जीवन त्यांच्या तना-मनात भिनलं आणि त्यातूनच या कवितांचा जन्म झाला. 


मराठीत वाहरू सोनवणे,भुजंग मेश्राम,उषा अत्राम,कुसुम आलाम,विनायक तुमराम,सुनील कुमरे ,सखाराम डाखोरे अशी एक आदिवासी कवितेची परंपरा आहे.प्रत्यक्ष आदिवासी जीवन जगलेल्या या कवींमध्ये आणि राऊत यांच्यामध्ये फरक हा आहे की त्या कवींनी आदिवासी जीवनाचा आणि लोकवाङ्मयाचा स्वतः अभ्यास केलेला नव्हता.त्यामुळेच ते आदिवासी असूनही त्यांची कविता आदिवासी लयीत बोलत नव्हती.पण राऊत यांची कविता तसं बोलते.कारण आदिवासी जीवनाचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने राऊत यांना कोरकू संवेदनेच्या अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली. 


या कवितांवर भाष्य करणारा एक सुंदर दीर्घ लेख किशोर सानप यांनी या संग्रहाच्या शेवटी लिहिला आहे.सुरुवातीला मधुकर वाकोडे यांची एक सुंदर प्रस्तावना आहे.वाकोडे सर आदिवासी जीवनाचे जाणकार आहेत.त्यांनी आदिवासी जीवनावर दोन कादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत.त्यामुळे या प्रस्तावनेत या कवितांवर त्यांनी मार्मिक भाष्य केलेलं आहे 


पण सानप यांचे भाष्य वाचून ही कविता खऱ्या अर्थानं कळते.त्यांनी या संग्रहातल्या प्रत्येक कवितेवर सविस्तर भाष्य केलेले आहे.प्रत्येक कवितेचा छंद कोणता तेही सांगितलेलं आहे.आणि कवितेचं मर्म उलगडून दाखवलं आहे.त्यामुळे चाळीस लघु कवितांवरचं हे भाष्य बेचाळीस पानाइतकं दीर्घ झालेलं आहे. 


या भाष्यात किशोर सानप यांनी अनेक धाडसी विधानं केलेली आहेत.वृत्त-छंद सोडल्यामुळे मराठी कविता सामान्य रसिकांपासून दूर गेलेली आहे,आतापर्यंतची आदिवासी कविता म्हणजे दलित कवितेची उपशाखा होती,खऱ्या अर्थानं पहिली आदिवासी कविता श्रीकृष्ण राऊतांनी लिहिली, सानप यांच्या या विधानांची गंभीर दखल घेऊन त्यावर मराठी वाङ्मयविश्वात चर्चा व्हायला हवी.त्यावर घुसळण व्हायला हवी. 


या सगळ्या कविता अत्यंत अल्पाक्षरी आहेत.सर्व कविता लयीतच आहेत.संग्रहातली पहिली आणि शेवटची कविता पावसावर आहे.या सर्व कवितांमधून आदिवासींच्या मुक्त जगण्यातला आनंद आणि शहरी माणसांनी त्यांच्या जगण्यात निर्माण निर्माण केलेले पेच ही दोन्ही अंगे सारख्याच सामर्थ्याने आलेली आहेत.या संग्रहातली मला खूप आवडलेली कविता मी खाली देत आहे.फाटक्या वस्त्रातील एका आदिवासी स्त्रीचा हा बोराटीच्या काटेरी झाडाशी झालेला संवाद आहे.प्रातिनिधिक रुपात सगळं आदिवासी जगणं आणि राऊत यांच्या कवितेची समग्र वैशिष्ट्य या कवितेत दिसतात.म्हणून मी ही कविता इथे देत आहे.पण आपण मुळातून या समग्र कविता वाचाव्यात अशी शिफारस मी यानिमित्तानं करील. 


बोराटीच्या काट्या

नको धरू पदराला

एकुलतं एक नेसू

मला नेसायला 


बोर वेचायला

आली सभागत

केळपानावाणी

झाली पदराची गत 


गाठी बांधून बांधून

झालं मासोळीचं जाळं

त्यात तूही दुसमाना

केलं तोंड काळं 


आणखी एक कविता देण्याचा मोह मला आवरत नाही.म्हणून या संग्रहातली पहिलीच कविता 'वरुणा वरुणा ' इथं देत आहे. 


वरुणा वरुणा

तुझ्या डोळ्यातून

झरुदे करुणा 


गाईच्या पोटाला

हिरवा चारा दे

चिमण्या ओठाला

दुधाच्या धारा दे 


मिठाच्या कणाला

झोंबू दे भाकर

मुंगीच्या सणाला

सांडू दे साखर 


तहानेचे बुंद

खुरात साचू दे

मुळांचा आनंद

शेंड्यात नाचू दे 


वरूणा वरूणा

तुझ्या डोळ्यातून

झरुदे करुणा

झरुदे करुणा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा