काय भुललासी वरलिया रंगा

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ॥

          संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे़  आपल्या नित्याच्या परिचयाच्या उसाच्या  दृष्टांतातून एक सोलीव तत्त्व सहज सुंदरपणे त्यात व्यक्त झाले आहे.  तत्त्वज्ञानाच्या  दृष्टीने तर या अभंगाला एकुणच संत वाङमयात तोड नाही. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो.  रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़.
          म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये.  फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही.आपले मीलन होणार नाही.
          ह्या पृथ्वी तलावर जेवढे म्हणून सजीव आहे.त्या सजीवाच्या ठायी चलन वलन करणारं जे चैतन्य आहे;  त्या चैतन्यरुपी परमतत्त्वाशी आपली गाठ होणार नाही.  आणि त्यालाच तर आपण जीवाशिवाची भेट म्हणतो. त्यापासून आपण वंचित राहू.माणूस-बाई, गुरंढोरं, कुत्रंमांजरं, झाडं-झुडुपं या सर्वाच्या ठायी वसणारं चैतन्यतत्त्व जसं आकारानं वाकडंतिकडं नाही तसं ते रंगानं काळं गोरंही नाही.
          आपल्या पंचेद्रियापैकी आजकाल डोळयांना आपण अवाजवी महत्त्व देऊ लागलो आहोत.   डोळयाला जाणवणार्‍या रंगाची आपल्याला, कमालीची भूल पडत चालली आहे. उपवर मुलाला जर विचारलं की बायको कशी पाहिजे तर तो चटकन उत्तर देतो-गोरी़  या गोरेपणासाठी मग मेकप आला.ब्युटीपार्लर आले.  फेसियल आले.ब्लिचिंग-फ्लिचिंग काय म्हणतात ते आले.उपवर मुलीलाही माहीत असतं की आपण आहोत त्यापेक्षा आधिक गोरं दिसलो तरच आपल्याला पसंत केलं जाणारं आहे.पाहुणे येणार म्हटलं की ती आपली दोन तास अगोदरच मेकपला बसलेली असते आणि ज्याला थोडा भडकच म्हणता येईल असा मेकप करून चहा-पोहे घेऊन पाहुण्यांसमोर येते़.
          उपवर मुलगा तिला पसंत करतो.दुसर्‍यांदा लग्नात तर ती ब्युटीपार्लरवाल्या बाईलाच घरी बोलावते आणि चेहरा रंगवते.लग्नानंतर घरी आणलेल्या नवरीला संसाराच्या रामरगाडयात जेव्हा दररोज तसा मेकप करणं शक्य होत नाही; तेव्हा तिचं मूळ रूप नवरदेवाला दिसते आणि आपली फसगत झाली हे जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा सुखी संसाराचे तीनतेरा वाजतात.
          यासारख्या फसगतीलाच तर संत चोखामेळा म्हणतात- काय भुललासी वरलिया रंगा.
          बरं गोरा हा आपल्या भारतीयांचा मूळ रंग नाही़  गोर्‍या रंगाचं आकर्षण हे इतिहास काळात अगदी अलीकडचं आहे. आपला राम सावळा होता.कृष्ण सावळा होता़.पंढरीचा विठोबाही सावळा आहे .खरं तर काळासावळा आहे.पण तुकारामाला ते ध्यान सुंदर वाटतं.कारण तुकाराम त्याला परम भक्तिभावानं न्याहाळतात.जगप्रसिद्ध असलेल्या लैला-मजनूच्या प्रेमकहाणीची नायिका लैला रंगाने काळी होती.पण ती आपल्या  दृष्टीनं,जनसामान्यांच्या दृष्टीनं. मजनूच्या  दृष्टीनं तर ती सुंदरच होती़.  तिच्यासाठी तो वेडापिसा झाला होता.मजनू म्हणजे वेडापिसा़. मजनू हे त्याचे मूळ नाव नाही़. त्याचे  मूळ नाव आहे कैस.लोक ते विसरलेत आणि प्रेमकथेत शिल्लक राहिली ती त्याची वेडी अवस्था- जुनूऩ. म्हणून तो मजनू़.
          प्रेमाच्या परमोत्कट अवस्थेचे नाव आहे परमेश्वर त्या अवस्थेत आपल्याला दर्शन होते परमतत्त्वाचे वाकडेतिकडे आकार आणि काळे-गोरे रंग आपल्याला भूल पाडत नाहीत़. शुद्ध रसपान करण्यात आपण इतके मश्गुल असतो की आपल्याला जगाचा विसर पडतो़  आणि आपण ज्याला ध्यान -ध्यान म्हणतो ते यापेक्षा वेगळे असते तरी काय ?


११ टिप्पण्या:

  1. प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे सप्रेम आभार

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर निरुपण .....मी तुमचे विवेचन वाचुन या अभंगावर प्रवचन केलं होतं

    उत्तर द्याहटवा