गझलांच्या वृत्तातील लवचिकता : श्रीकृष्ण राऊत

मराठी गझल : तीन वळणे

.............................................

इ. स. १९१९ मध्ये माधवराव पटवर्धनांनी उर्दू मधील गझलांच्या वृत्तांचा परिचय मराठीला करून दिला या घटनेला आज घडीला शंभर वर्षे झाली.
इ.स. १९६३-६४ च्या   पासून सुरेश भटांनी गझल फॉर्मच्या जाणिवेच्या पातळीवर गझल लिहायला सुरुवात केली या गोष्टीलाही आज पन्नास वर्षाहून अधिक काळ उलटून गेला.
पाडगावकर करंदीकरांनी थोड्याफार फरकाने माधवरावांच्या वळणानेच गझल लिहिली. 'मी गझलेकडे वळलो ते माधवरावांच्या प्रभावामुळे ' अशी स्पष्ट कबुली करंदीकरांनी एका मुलाखतीत दिली आहे. पाडगावकरांच्या 'त्रिवेणी ' ह्या संग्रहात न-गझल, बोल गझल अशी प्रायोगिक गझल समाविष्ट आहे.माधवराव - करंदीकर - पाडगावकर यांचे गझल लेखन हे मराठी गझल चे पहिले वळण होय ह्या वळणावरील गझल बहुतांशी भावगीतात्मक आहे.
            ज्याला आपण गझलीयत म्हणतो तो गझलेचा खास बाज सुरेश भटांनी मराठीत आणला. थेट संवादी शैली, मराठमोळ्या प्रतिमा आणि जनसामान्यांची भाषा ही अंगभूत वैशिष्ट्ये घेऊन सुरेश भटांची मराठी गझल अवतरली. हे मराठी गझलचे दुसरे आणि अत्यंत महत्त्वाचे वळण होय.
इ.स. २००३ मध्ये सुरेश भटांचे देहावसान झाले. त्यानंतरच्या काळात संगणक,इंटरनेट, पोर्टल, ब्लॉग्ज, फेसबुक, यूट्युब, व्हॉट्सऍप, गझल गायनाच्या मैफिली, गझल मुशायरे अशी नवी माध्यमे मराठी गझलला उपलब्ध झाली.आणि गेल्या दहा-पंधरा वर्षात संख्येने फार मोठ्या प्रमाणात मराठीत गझल लिहिल्या गेली. अत्यंत माफक दरात मोबाईल डेटा उपलब्ध झाला त्यामुळे चोवीस तास सहज हाताशी असलेले फेसबुक आणि व्हॉट्सऍप ही आजच्या तारखेत मराठी गझलची हक्काची माध्यमे झाली. नव्या माध्यमांची नवलाई आणि अतिउत्साही तरुणाई  असा दुथडी भरून मराठी गझलचा प्रवाह सध्या वाहतो आहे. रचायला आणि वाचायलाही आटोपशीर असलेला गझलचा आकृतिबंध या प्रवाहाला वेगवान व्हायला सहाय्यभूत ठरतो आहे.प्रत्येक कालखंडात चांगल्या कवितेचं सुमार कवितेशी असणारं प्रमाण जसं व्यस्त  असतं तसंच प्रमाण ह्या डिजिटल माध्यमाातून प्रसिद्ध होत असलेल्या चांगल्या गझलांचंही आहे.
गझलच्या आकृतिबंधाची जाचक बंधने सैलसर करण्याकडे ह्या गझल प्रवाहाचा कल आहे.उदाहरणार्थ आजची मराठी गझल केवळ अक्षरगणवृत्तात लिहिली जात नाही. आशयाच्या सहज अभिव्यक्तीसाठी अक्षरगणवृत्तातला क्लिष्ट लगक्रम बाधा आणतो आणि काही अंशी कृत्रिमतेला वाव देतो,याची जाणीव झाल्याने आज फार मोठ्या प्रमाणात मराठी गझल मात्रावृत्तात लिहिली जाते.
मात्रावृत्तात शब्दातल्या प्रत्येक अक्षराचा विशिष्ट
लघु - गुरू क्रम आवश्यक नसतो. आठ -सहा- चार मात्रांची आवर्तने मात्रावृत्तात असतात.
त्यामुळे अक्षरगणवृत्ता च्या तुलनेत मात्रावृत्तात अभिव्यक्तीच्या दृष्टीने शब्द निवडीला फार मोठा वाव असतो. मात्रावृत्तात शब्दरचना सुकर आणि त्यामुळे अधिक सहज होण्याची संभावना असते. 'शक्यतो अक्षरगणवृत्तात गझल लिहावी ' असे सुरेश भटांनी गझलेच्या 'बाराखडी 'त सांगितले असले तरी अलीकडच्या काळात मात्रावृत्तात लिहिल्या गेलेल्या गझलांची संख्या फार मोठी आहे. गझल लेखनातली ही प्रवृत्ती  अभिव्यक्तीच्या स्तरावर सुलभते कडून नैसर्गिकतेच्या  दिशेने प्रवास करीत असल्याचे दिसते.

स्वराक्षर काफिया आणि स्वरकाफिया
.............................................
स्वराक्षर काफिया
............................

गझल ह्या काव्यप्रकारातील यमक म्हणजे काफिया. पण गझल मधील हा यमक प्रकार उच्चारदृष्टया कडक शिस्तीचा  असतो. गझल सोडून इतर काव्यप्रकारात 'आला /गेला ' अशी यमके साधली तरी चालतात. परंतु गझल मध्ये 'आला /गेला ' काफिया होऊ शकणार नाहीत. कारण 'आला / गेला ' मधील 'ला ' अक्षराच्या पुनरावर्तनापूर्वी येणारे आ/ ए  ह्या स्वरात समानता नाही .
काफिया मध्ये अक्षरांच्या पुनरावर्तनासोबतच त्यापूर्वीच्या अक्षरातील स्वर साम्य आवश्यक असते. म्हणून अशा काफियांना स्वराक्षर काफिया म्हणतात.
उदा.
माळला, गाळला, वाळला, चाळला, जाळला या शब्दांमध्ये ‘ळला’ अशा दोन अक्षरांची पुनरावृत्ती तर होतेच पण त्याशिवाय ह्या पुनरावृत्तीपूर्वीच्या मा, गा, वा, चा,जा, ह्या अक्षरांतला ‘आ’ हा स्वर देखील समान राहतो. यात  'खेळला ' हा शब्द काफियाचा होऊ शकणार नाही. त्यात 'ळला ' ह्या अक्षरांची पुनरावृत्ती होते परंतु ह्या पुनरावर्तनापूर्वी येणाऱ्या 'खे' ह्या अक्षरात समाविष्ट
'ए ' स्वर इतर शब्दातील 'आ' स्वराशी जुळत नाही.
कोणत्याही भाषेत स्वराक्षर काफियांच्या शब्दांची संख्या मर्यादितच असते. अनेकदा ही संख्या सहा- सात शब्दांच्या पलीकडे जात नाही. ही बाब गझल रचताना  बाधा उत्पन्न करते. अशा प्रकारच्या कडक शिस्तीतून मुक्त होण्यासाठी स्वरकाफियाचा जन्म झाला.

स्वरकाफिया
..................

काफिया म्हणून योजिलेल्या शब्दांत जेव्हा एकाही अक्षराचे पुनरावर्तन नसते. तर शब्दांतील शेवटच्या अक्षरांचा केवळ स्वर समान असतो. तेव्हा त्या काफियाला स्वरकाफिया असे म्हणतात.
उदा. नखरे / शहाणे
ह्या दोन शब्दांच्या  शेवटी येणाऱ्या 'रे ' आणि 'णे ' ह्या अक्षरातील 'ए' स्वराच्या साम्यामुळे
त्यांना गझलमध्ये स्वर -काफिया म्हणतात . परंतु इतर काव्यप्रकारात
'नखरे ' ह्या शब्दाला 'शहाणे ' चे यमक म्हणणे योग्य होणार नाही. ते 'यमक ' संकल्पनेच्या व्याख्येत बसणार नाही.
उर्दू -हिन्दी - गुजराती गजलात सर्रास आढळणारा स्वरकाफिया देखील मराठी गझल स्वीकारू लागली आहे. माधव जूलियन आणि सुरेश भट यांनी एक्कट -दुक्कट गझलेत योजलेला स्वरकाफिया अलीकडच्या मराठी गझलात फार मोठ्या प्रमाणात आढळतो. हे मराठी गझलच्या तिसऱ्या वळणाचे महत्वाचे वैशिष्ट्य  होय.

चमत्कृतीजन्य अमूर्तता
...............................

हिन्दी - गुजराती गझलांच्या  अनुकरणातून आशयाची अमूर्तता, चमत्कृती सुद्धा मराठी गझलेत प्रवेश करू लागली आहे. अॅब्सर्ड आणि अॅबस्ट्रॅक्ट चित्रकलेसारखा हा प्रकार आहे. रंग -रेषा -आकार ह्या माध्यमाच्या तुलनेत गझलमधील अमूर्तता, चमत्कृती भाषिक पातळीवर  वाचकांशी संवाद साधण्यास असमर्थ ठरते.
१९७० च्या दशकात हा प्रयोग गुजराती गझलेत झाला पण तो फार काळ टिकला नाही. नंतरच्या गुजराती गझलकारांनी संवादी परंपरेचा धागा पुन्हा जुळवून घेतल्याचे दिसते. मराठी गझलेतील चमत्कृतीजन्य अमूर्ततेचे भागधेय यापेक्षा वेगळे असणार नाही. कारण भाषेचा जन्मच मुळात संवादासाठी झालेला आहे.
मात्रावृत्त,स्वर काफिया आणि आशयाची अभिव्यक्तीच्या पातळीवर होणारी अमूर्त मांडणी अशा त्रिमितीने आजची मराठी गझल तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घाटदार वळणावर उभी आहे. मराठी गझलच्या ह्या तिसर्‍या वळणावर सहज अभिव्यक्तीकरिता मराठी गझलने आणखी एक उपयुक्त बाब अवलंबिली  पाहिजे. आणि ती बाब म्हणजे गझलांच्या वृत्तातली लवचिकता होय.

छंदशास्त्र : ध्वनीरूपाचे अधिष्ठान
..................................................

उर्दूतून आलेली गझल अनेक भारतीय भाषांमध्ये रुजली. त्यांनी उर्दूचे छंदशास्त्र लवचिकतेसह स्वीकारले. संस्कृत छंदशास्त्रात तीन अक्षरांचा गण असतो तर उर्दू छंदशास्त्रात  तीन,चार आणि पाच अक्षरांचे गण असतात. संस्कृत छंदशास्त्र आणि उर्दू छंदशास्त्र यामधील हा महत्त्वाचा फरक आहे. चार अक्षरांच्या गणाने सिद्ध झालेली अनेक नवीन वृत्ते मराठीत आली त्यांचा उपयोग सुरुवातीला माधव ज्युलियन यांनी आपल्या गझलात आणि नंतरच्या कवींनी त्यांच्या कवितेत केलेला आहे.
छंदशास्त्र संस्कृत असो की उर्दू ते अक्षरांच्या उच्चारावर निर्माण झालेले आहे.
अक्षरांचे ध्वनीरूप हे छंदशास्त्राचे अधिष्ठान आहे.
गद्य किंवा पद्यातली कोणतीही अर्थपूर्ण ओळ अनेक शब्दांनी बनलेली असते. ओळीतील प्रत्येक शब्द अनेक अक्षरांनी मिळून तयार झालेला असतो.
तर शब्दातील हरेक अक्षरात व्यंजन आणि स्वर यांचा संयोग असतो. ध्वनीरूप असलेला स्वर हा कोणत्याही भाषेचा परमाणू असतो.

स्वरांचे उच्चारानुसार तीन विभाग
...................................................

अ, आ, इ, ई,उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
ह्या स्वरांची संख्या बारा असल्याने प्रत्येक व्यंजनात हे स्वर समाविष्ट होऊन अक्षरांची बाराखडी तयार होते. छंद शास्त्रानुसार या बारा अक्षरांचे तीन विभाग पडतात.
१) अ, इ, उ
२ )आ, ई,ऊ, ए, ओ
३ )ऐ,औ, अं, अः

पहिल्या भागातील
अ, इ, उ ह्या तीन स्वरांनी युक्त असलेली अक्षरे उदा .क, कि, कु यातील प्रत्येक अक्षर यांना उच्चारण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला एकक म्हणून एक पट गृहीत धरले जाते. एक पट कालावधीला छंदशास्त्रात  'लघु ' म्हणतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या विभागातील आ, ई, ऊ, ए, ऐ,औ, अं, अः ह्या नऊ स्वरांनी युक्त असलेली अक्षरे
उदा. का, की, कू, के, कै, को, कौ, कं,कः यातील प्रत्येक अक्षर
उच्चारणासाठी लागणारा कालावधी दोन लघु इतका म्हणजे दुप्पट असतो. त्याला छंदशास्त्रात  'गुरू ' म्हटले जाते. लघु चा संक्षेप 'ल' आणि गुरूचा संक्षेप 'गा' छंदशास्त्रात रूढ आहेत.लघु -गुरूंचा हा उच्चारण कालावधी सापेक्ष असतो. प्रत्यक्षात लोक जी भाषा बोलतात त्यांच्या उच्चारांशी ह्याचा संबंध आपण जोडू शकत नाही.

शब्दोच्चार आणि आधुनिक भाषाविज्ञान
.........................................................

प्रदेशानुसार, व्यवसायानुसार, शैक्षणिक स्तरानुसार, सामाजिक स्तरानुसार,बोलीच्या वैशिष्ट्यानुसार एकाच शब्दाचे विविध प्रकारचे उच्चार भाषेत रूढ असतात. जगातली कोणतीही भाषा जेवढ्या प्रमाणात 'लिहिली ' जाते त्याच्या लाखपटीने ती 'बोलली ' जाते. त्यामुळे भाषेचे उच्चार रूप हे अधिक नैसर्गिक असते.  ह्याला प्रमाण मानून एकाच शब्दांचे सर्व उच्चार शुद्धच असतात असे
आधुनिक भाषाविज्ञानाने मान्य केले आहे.
'कमल ', 'नयन ', 'नजर ', 'बहर ' ह्या शब्दांचे उच्चार क+ मल, न+यन, न+जर, ब+हर असे 'लगा ' ह्या लगक्रमाने घ्यावेत. ते कधीही  कम+ ल, नय+ न, नज+ र, बह+ र अशा 'गाल ' ह्या लगक्रमाने घेऊ नयेत असा छंदशास्त्राचा नियम आहे.
मोडीत निघालेल्या  छंदशास्त्राच्या इतर कठोर नियमासारखा
हा नियमही मोडीत निघू शकतो. प्रत्येक भाषेत कालानुरूप लिपीचे सुलभीकरण होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. अनुस्वाराकरिता ङ, 'ञ ', 'ण ' ह्या व्यंजनांचा उपयोग करून संगणक आणि मोबाइलवर टाइप करणे अवघड होऊ लागले आहे. पारंपारिक छंदशास्त्र आणि आधुनिक भाषाविज्ञानाच्या मतभेदात उच्चारांचे कोणते प्रामाण्य मानावे असा
पेच गझलकारांपुढे निर्माण झाला आहे. अर्थात याबाबतीतही आपण लवचिक असावं असं मला वाटते.

वेलांटी - उकारांची मर्यादित सूट
...............................................

अभिव्यक्ती आशयधन होण्यासाठी कवितेतल्या ओळीत अर्थवाही शब्दांची अचूक निवड करावी लागते ती  करता यावी म्हणून छंदशास्त्राने कवीला मर्यादित प्रमाणात सूट दिली आहे. उदाहरणार्थ 'ई ', 'ऊ ' या स्वरांनी युक्त
 'की ' , 'कू ' ही दीर्घ अक्षरे प्रत्यक्ष लेखनात 'इ ', 'उ' स्वरयुक्त म्हणजे ऱ्हस्व लिहिता येतील. 'उगीच ' हा शब्द 'उगिच ' असा लिहिता येतो तर 'पाहून ' हा शब्द 'पाहुन ' असा लिहिता येईल. म्हणजे मुळात शुद्धलेखनानुसार गुरु असलेल्या वेलांटी, उकाराच्या उच्चारांना 'लघु 'करून वृत्ताची  पूर्तता करण्याची सवलत कवीला मराठीत परंपरेने मान्य झालेली आहे.
स्वरांच्या दुसऱ्या विभागातील आ, ई,ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः ह्या नऊ स्वरांपैकी 'ई ' 'ऊ ' अशा दोनच स्वरांनी युक्त अक्षरांच्या उच्चाराकरिता ही सवलत मराठीत उपलब्ध आहे.

सवलतीची रुंदावलेली कक्षा
..............................................

उर्दू छंदशास्त्रानुसार मात्र ई, ऊ,आ,ए, ओ,  अशा स्वरांनी युक्त असलेल्या अक्षरांना अशी सवलत दिली जाते. उर्दू छंदशास्त्राने  सवलतीची कक्षा अधिक रुंदावली आहे. ह्या सवलतीनुसार  शब्दांच्या शेवटच्या अक्षरांचे किंवा एकाक्षरी शब्दांचे दीर्घ वेलांटी - उकार मात्रा घटविण्यासाठी ऱ्हस्व लिहीत नाहीत.

गझलांच्या वृत्तातील लवचिकता
.................................................

उपरोक्त रूंद सवलतीलाच गझलांच्या वृत्तातील लवचिकता म्हटले आहे. ह्या लवचिकतेला उर्दूत 'हर्फ गिराना ' हिन्दीत 'मात्रा गिराना ' आणि गुजरातीत 'मात्रा लोप' असे म्हटले जाते. उर्दू छंदशास्त्रात सुरुवातीला अपवाद म्हणून, नंतर सूट म्हणून मान्यता पावलेली ही लवचिकता उस्ताद शायरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात रूढ केली की त्या लवचिकतेचे नंतर नियम तयार झाले. वृत्तातील लघु -गुरूक्रमानुसार आवश्यक असेल तेथे शब्दातील 'गुरू ' अक्षरांचा उच्चार 'गुरू ' ठेवता येईल आणि निकड असेल तेथे त्याच अक्षरांचा उच्चार 'लघु 'करता येईल.अशा स्वरूपाची ही सवलत असल्यामुळे तिला गझलांच्या वृत्तातली लवचिकता म्हटले आहे.
'मात्रागिराना ' ह्या संकल्पनेला आपण मराठीत 'मात्रा घटवणे' म्हणू शकतो. पण या दोन्ही नामा पेक्षा तिला
'लवचिकता ' म्हणणे अधिक योग्य वाटते.
Columbia.edu ह्या संकेतस्थळावर मीर तक़ी मीर यांच्या सहा दीवानमधल्या १९१६ आणि ग़ालिब यांच्या २३४ गझलांच्या
वृत्तांचा लगक्रम
दिलेला आहे.तेथे गझलांच्या वृत्तांसंबंधी एक अत्यंत उपयोगी पुस्तिका दिलेली आहे. ह्या पुस्तिकेच्या शेवटी दिलेली संदर्भ ग्रंथ सूची पाहिली की ह्या पुस्तिकेचे महत्व अधोरेखित होते .
URDU METER :A PRACTICAL HANDBOOK
-F. W. Pritchett & Kh. A. Khaliq
ह्या पुस्तिकेत दुसरे प्रकरण आहे- Flexibility. ज्यात
'मात्रागिराना ' ह्या संकल्पनेला स्पष्ट केले आहे . त्यावरुन ह्या संकल्पनेला  'लवचिकता ' संबोधणे अधिक उचित आहे,असे मला वाटले. दीर्घ स्वरयुक्त शब्दांतील संबंधित अक्षरांच्या  पाहिजे तेव्हा दोन मात्रा आणि हवी तेव्हा एक मात्रा मोजण्याची लवचिकता आहे.
माधवराव पटवर्धनांनी अरबी -फारसीतली वृत्ते 'शुद्ध' स्वरूपात मराठीत आणली,
म्हणजे काय केलं ?तर त्या वृत्तात असलेली लवचिकता ज्याला माधवराव 'शैथिल्य' म्हणतात ती लवचिकता माधवरावांनी काढून  टाकली आणि त्या वृत्तांना गझल रचनेत शब्द निवडीच्या अंगाने पुन्हा कठोर करून टाकले.
अरबी -फारसी -उर्दूच्या छंदशास्त्रात
ही लवचिकता का आली असावी ? हा विचार माधवरावांना महत्वाचा वाटला नाही. इथे माधवरावांच्या छंदशास्त्री भूमिकेने, प्रत्यक्ष गझल रचना करणाऱ्या त्यांच्यातल्या  कवीवर एक प्रकारे मात केली.
माधवरावांच्या काळी आणि आजही   शुद्धलेखनानुसार दीर्घ असलेल्या शब्दाच्या  वेलांट्या आणि उकार ऱ्हस्व करून वृत्तबद्ध कवितेतल्या शब्दात आपण स्वीकारल्या आहेत.
आ,ए, ऐ,ओ,औ ह्या मात्रांना ऱ्हस्व   करणारी चिन्हे उपलब्ध नसल्याने ह्या मात्रा लवचिक कशा करायच्या ही समस्या अरबी -फारसी वृत्तात  गझल रचना करणाऱ्या शायरांनी आ, ई, ऊ,ए ,ओ  ह्या दोन मात्रांचे उच्चार शब्दांच्या शेवटी येणाऱ्या अक्षरात आवश्यक असेल तेथे दोन मात्रांचे ठेऊन, निकड असेल तेथे एका मात्रेच्या उच्चार
कालावधीत उच्चारण्याचे स्वीकारले आणि अरबी -फारसी वृत्तांना आशयसापेक्ष लवचिकता प्रदान केली.ज्यामुळे नेमक्या अभिव्यक्ती साठी शब्द निवडीचा  अवकाश गझलकारांसाठी अधिक  व्यापक व्हायला मदत झाली.
वृत्तातील अशा प्रकारच्या लवचिकतेचा अवलंब  मराठी गझलेत होण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. गुजराती भाषेत गझल लिहिणारा युवा कवी हेमंत पुणेकर. याने गुजराती गझललेखनात वृत्तातली लवचिकता अगदी सहजतेने आणली. तसाच यशस्वी प्रयत्न त्याने मराठीतही केला आहे. त्याला नुकतेच मुंबईत 'शयदा ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शयदा(१८९२-१९६२) यांचे पूर्ण नाव हरजी लवजी दामाणी. उर्दूच्या सांकेतिक प्रतिमांच्या प्रभावापासून मुक्त असलेली तंत्रशुद्ध गझल 'शयदा ' यांनी गुजरातीत लिहिली. 'शयदा ' यांच्या गझलांनी गुजराती गझल परंपरेला ज्या प्रकारचं अस्सल गुजराती वळण लावलं तसंच मराठमोळं वळण सुरेश भटांच्या गझलांनी मराठी गझल परंपरेला दिलं आहे.
गुजराती गझलेला असलेली दीडशे वर्षांची परंपरा मराठी गझल परंपरेहून अधिक मोठी आहे. कलापिकृत 'हमारी पिछान ' ह्या गुजराती गझलचे ३० एप्रिल १९१९ ला माधव जूलियन यांनी  केलेले  मराठी भाषांतर 'आमची ओळख ' ह्या शीर्षकाने त्यांच्या 'गज्जलांजली ' ह्या संग्रहात' समाविष्ट आहे.
हेमंत पुणेकर यांनी गुजराती भाषेत जवळपास ऐंशी गझला लिहिल्या आहेत.  गझलांच्या वृत्तांतली लवचिकता पुणेकरांच्या गुजराती गझलांनी आत्मसात केली आहे. इ.स. २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या डॉ.रईश मनिआर  यांच्या 'गझलनुं छंदोविधान ' या ग्रंथात गझलांच्या वृत्तातील 'मात्रा लोप ' म्हणजेच लवचिकतेचा सोदाहरण परिचय करून दिला आहे. मराठीत अशा प्रकारचे पुस्तक अजून आलेले नाही. अशा प्रकारच्या पुस्तकाची उणीव भरून काढण्यासाठी प्रस्तुत लेखाचा उपयोग झाल्यास माझे श्रम सार्थकी लागतील.
हेमंत पुणेकरांनी काही मराठी गझलांचे समवृत्त अनुवाद गुजरातीत केले आहेत. आणि स्वतंत्रपणे केवळ सहा गझला मराठीत लिहिल्या आहेत. गुजराती गझल लिहीत असताना ज्या सहजतेने  गझलांच्या वृत्तातल्या लवचिकतेचा अवलंब पुणेकरांनी केला अगदी तितक्याच सहजपणे त्यांनी मराठी गझल लिहितांना लीलया ही लवचिकता आणली आहे. पुढे दिलेली उदाहरणे हेमंत पुणेकर यांच्या मराठी गझलांच्या शेरांची  आहेत.

लवचिकतेकरिता मात्रा घटविण्याचे नियम
.............................................................

१)सर्व एकाक्षरी शब्दांच्या मात्रा घटवता येतात.

उदा . मी, तू, तो, ती, ते, हा, ही, हे, हो, रे, का, की, वा, गा
वृत्त - प्रभाव
लगक्रम - ल गा x ७
मी आरश्या समोर जे सरावले सतत
तू भेटली की तेच शब्द अवघडायचे
लगक्रमानुसार
पाडलेले खंड
(मी)आ/रश्या /समो/र जे /सरा/वले /सतत
(तू) भे /टली /(की) ते /च श/ब्द अव/घडा/यचे
कंसात दर्शविलेल्या 'मी ' 'तू ' 'की ' ह्या 'गुरू 'अक्षरांची मात्रा घटवून उच्चारात
'लघु ' केली आहे.

२) शब्दांच्या शेवटी येणाऱ्या अक्षराच्या मात्रा घटवता येतात.

शब्दाच्या प्रारंभी किंवा मधे येणाऱ्या अक्षरांच्या मात्रा घटवता येणार नाहीत.
उदा. ' माझे ' या शब्दाचे शेवटचे अक्षर ' झे ' उच्चारणात लघू करता येईल.
उर्दू - हिन्दीत मेरा/ तेरा / कोई ह्या शब्दातील 'रा / ई ' ही  शेवटच्या अक्षरांच्या मात्रा नियमाप्रमाणे घटवता येतात तसेच 'मे '/ 'ते '/'को ' ही प्रारंभाची अक्षरे असूनही त्यांच्या मात्रा घटवल्या जातात.ही सूट  बहुतांश वेळा  घेतली जाते.  मराठी गझलेत वारंवार येणारे अशा प्रकारचे काही शब्द भविष्यात लवचिकतेच्या दृष्टीने रूढ होऊ शकतील.
वृत्त -लज्जिता
लगक्रम -
गा ल गा / गालगा /
लगागागा
जन्म घालवता येतो सोबत, पण
आपले आपले मरण आहे
जन्म घा/लव(ता) ये/(तो) सोबत, पण
आपले /आपले /मरण आहे
'घालवता ' शब्दातील शेवटचे अक्षर 'ता ' आणि 'येतो ' शब्दातील शेवटचे अक्षर 'तो ' कंसात दर्शविले आहे. ह्या 'गुरू 'अक्षरांच्या मात्रा उच्चारात घटवून 'लघु' केल्या आहेत.
क्ष, ज्ञ,त्र,द्ध अशी जोडाक्षरे शब्दाच्या शेवटी येत असतील आणि ती दीर्घ स्वरयुक्त असतील तर त्यांच्या मात्रा अलवचिक असतात. त्या गुरू अक्षरांच्या मात्रा घटवून लघु होत नाहीत. उदा. परीक्षा, आज्ञा, पत्रे, सुद्धा

३) स्वरसंधी

शब्दाच्या शेवटी अकारांत अक्षर येत असेल आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या शब्दाचा प्रारंभ -आ,ई,ए, ऐ,ओ,औ,अं अशा केवळ स्वराने होत असेल तर दोन्ही शब्दांच्या सलग उच्चारात पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षरातील 'अ ' स्वराचा लोप होऊन नंतरच्या शब्दातील प्रारंभीच्या स्वराचा संयोग  पहिल्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाशी होतो.
वृत्त -भुजंगप्रयात
लगक्रम - लगागाx३
पुन्हा जन्मली ही मनात एक आशा
बघूया पुढे काय होतो तमाशा
लगक्रमानुसार खंड
पुन्हा ज/न्मली ही मना(त ए)/क आशा
बघूया /पुढे का/य होतो /तमाशा
'मनात ' शब्दातील  'त 'ह्या अकारांत अक्षराचा स्वरसंयोग नंतर लगेच येणाऱ्या 'एक ' ह्या शब्दातील प्रारंभीच्या 'ए' स्वराशी होऊन मनात + एक = मनातेक असा संयुक्त  उच्चार होतो. आणि 'मनात ' शब्दातील 'त' ह्या अक्षरातील 'अ ' स्वराचा लोप होतो. आणि वृत्तातील निश्चित लगक्रम उच्चारानुसार सिद्ध होतो. मनाते /क आशा = लगागा / लगागा

४) वृत्ताच्या लगक्रमानुसार अतिरिक्त होणारे एक अकारांत अक्षर ओळीच्या शेवटी आले तर चालते.

उदा.
मात्रावृत्त -
मात्रा - ८ / ८
स्टेशन आले की तो उतरणार
कोण कुणाच्या सोबत असतो

मात्रानुसार खंड-

स्टेशन आले / (की) तो उतरणा(र)
कोण कुणाच्या / सोबत असतो

कंसात दर्शविलेल्या एकाक्षरी 'की ' ह्या गुरू अक्षराची मात्रा घटवून लघु म्हणजे एक झाली आहे. आणि ओळीच्या शेवटी आलेल्या
'उतरणार' ह्या शब्दाचे शेवटचे 'र' हे अकारांत अक्षर अतिरिक्त म्हणून आठ मात्रा मोजताना सोडून दिले आहे.

५) फक्त अक्षरगणवृत्तातच नाही तर वरीलप्रमाणे मात्रावृत्तातही
मात्रा घटविण्याची लवचिकता घेता येते.

६) शब्दाचे शेवटचे अक्षर आणि त्यानंतर येणारा एकाक्षरी शब्द
अशा दोन्ही अक्षरांच्या मात्रा घटवू नयेत.

उदा. ' येतो रे  ' असे दोन शब्द एकापाठोपाठ एक आल्यास 'तो ' आणि 'रे ' या दोनपैकी एकाच अक्षराची मात्रा घटवावी.

७) प्रत्येक ओळीत मात्रा घटविण्याची सूट शक्य तेवढ्या कमी वेळा घेतली पाहिजे.

८) व्यक्तींच्या आणि शहरांच्या नावात मात्रा घटवण्याची सवलत घेऊ नये. उदा .सीता, मीरा, मुंबई, दिल्ली,

९) स्वरांच्या तिसऱ्या विभागातील ऐ, औ, अं, अः अशा स्वरांनी युक्त असलेले एकाक्षरी शब्द मराठीत नाहीत.

'स्वतः' हा शब्द वगळता ऐ, /औ, /अं/अः अशा स्वरांनी युक्त असलेले अक्षर   शेवटी असणारे शब्दही नाहीत. मात्र हिन्दी उर्दूत 'मै' 'है ' अशा एकाक्षरी शब्दांच्या मात्रा घटविल्याची उदाहरणे फार मोठ्या प्रमाणात सापडतात.
मराठी भाषेतील अनेक शब्द इतर भारतीय भाषेतून आले आहेत. तसेच काही शब्द अरबी -फारसी - इंग्रजीतून येऊन मराठीत बेमालूमपणे मिसळले आहेत.
उच्चाराप्रमाणे त्यांचे मूळ लिखित रूप संबंधित भाषेत कसे होते हे महत्वाचे नसून त्या शब्दाचे आज मराठीत  कोणते रूप अद्यावतपणे रूढ आहे त्याचा विचार करावा.
मराठी गझल 'लिहिली ' जात असल्याने शेर  'कहना ' ही उच्चाराधिष्ठित संकल्पना पचनी पडायला आपल्याला थोडा वेळ लागेल. उच्चारातल्या
गतीशील ' ध्वनी ' पेक्षा लिपीतली स्थितीशील 'चिन्हे ' मराठीत  प्रमाणित मानण्याची प्रवृत्ती
अल्पशा प्रमाणात का होईना पण लवचिक होताना अगदी अलीकडच्या काही गझलांमधून दिसते आहे. हिन्दी चित्रपटातली अनेक गाजलेली गाणी उर्दू गझलांच्या वृत्तात लिहिली असून त्यातही अशा प्रकारची लवचिकता आहे. शब्दांची ओढाताण किंवा कर्णकटुता त्यात अल्पांशाने जाणवत नाही. त्यामुळे ही उच्चारसिद्ध लवचिकता श्रुती सिद्धही झाली आहे .
.............................................
श्रीकृष्ण राऊत
भ्रमणध्वनी : 8668685288
.
'आशय ' दिवाळी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा